बुधवार, १६ जून, २०१०

आजही तोच संघर्ष

नुकताच दूरदर्शनवर दिलीपकुमार यांचा पैगाम सिनेमा पाहण्यात आला. या चित्रपटात कामगार मालक संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे साधारण साठच्या दशकातही (नक्की नाही) कामगार-मालक संघर्ष सुरू होता. त्यानंतर अनेक कामगार संघटना कामगारांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी तयार झाल्या. त्याच प्रकारे या संघटनांनी बऱ्यापैकी कामगारांचे प्रश्‍नही सोडवले. मात्र त्या काळीही कामगारांचे शोषण होत होते व ते आजही होत आहे. त्याकाळी कामगार अशिक्षित असल्यामुळे हक्क मागण्यासाठी ते फारसे उत्सुक नसत. मात्र आजही त्याच प्रकारे कामगारांची पिळवणूक होत आहे. आज कामगार संघटना या कंपन्यांतून हद्दपार झाल्या आहेत. तसेच आज पुर्वी प्रमाणेच कामगारांना करारावर घेतले जाते. त्यामुळे त्या कामगाराला कधीही कंपनी कमी करू शकते. त्याच प्रकारे आज कामगारही शिक्षित आहे; मात्र तरीही त्यांची पिळवणूक सुरू आहे. त्यामुळे देश प्रगती करित आहे, या वाक्‍याला काहीच अर्थ नाही असे, मला वाटते. कारण कामगारांसाठी आज आवाज उठविण्यासाठी कोणतीही संघटना नाही. आहेत त्या फक्त सरकारी खात्यांत व या संघटनांच्या माध्यामातून सरकारी कर्मचारी आपल्या अवास्तव मागण्या पूर्ण करून घेताना दिसत आहेत. मात्र खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी कोणीही बोलण्यास पुढे येताना दिसत नाही. आज सुशिक्षित कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते, मात्र त्याकडे ना सरकारचे लक्ष ना लोकप्रतिनिधींचे त्यांना फक्त भांडवलदारांचे भले करून आपले भले करायचे असते. त्यामुळे ते अशा प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे या कामगारांना आज कोणीही वाली राहिला नाही असे दिसते. त्यामुळे कामगारांच्या प्रश्‍नासाठी कामगार संघटनांनी काम करण्याची गरज आहे.